मुंबई, १९ ऑगस्ट २०२६ : ग्रामसेवकांच्या हजेरीसाठी जीपीएस आणि बायोमेट्रिक प्रणालीचा प्रभावी वापर करण्याबाबत महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास विभागाने जिल्हा परिषदांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना पुन्हा सूचना दिल्या आहेत.ग्रामपंचायत अधिकारी तसेच पूर्वीचे ग्रामसेवक/ग्रामविकास अधिकारी यांच्या हजेरीसाठी जीपीएस व बायोमेट्रिक हजेरी प्रणाली राबविण्यासाठी आवश्यक कार्यवाही आपल्या स्तरावर करण्याबाबत यापूर्वीच संबंधितांना कळविण्यात आले होते. मात्र, या प्रणालीच्या अंमलबजावणीबाबत कार्यवाही होत नसल्याच्या तक्रारी शासनाकडे प्राप्त होत असल्याचे पत्रात नमूद करण्यात आले आहे.या पार्श्वभूमीवर ग्रामपंचायत अधिकाऱ्यांची हजेरी जीपीएस व बायोमेट्रिक प्रणालीच्या माध्यमातून घेण्याबाबत योग्य ती कार्यवाही करण्याच्या पुनःश्च सूचना ग्रामविकास विभागाने दिल्या आहेत.महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास विभागाचे कार्यासन अधिकारी नितीन स. पवार यांच्या स्वाक्षरीने १९ ऑगस्ट २०२६ रोजी हे पत्र जारी करण्यात आले आहे. पत्राची प्रत अपर आयुक्त (आस्था), सर्व विभागीय आयुक्त कार्यालये तसेच संबंधित आस्थापना शाखेला देण्यात आली आहे.शासनाच्या या सूचनेमुळे ग्रामपंचायत स्तरावरील कर्मचाऱ्यांची उपस्थिती अधिक पारदर्शक आणि शिस्तबद्ध पद्धतीने नोंदविण्याच्या प्रक्रियेला गती मिळण्याची शक्यता आहे.
