फलटण : विठ्ठल बाबुराव निकाळजे यांच्या सेवापूर्ती निमित्त आयोजित गौरव समारंभ उत्साहपूर्ण व भावनिक वातावरणात पार पडला. शिक्षण क्षेत्रात जिद्द, कष्ट, निष्ठा आणि प्रामाणिकपणे कार्य करत विद्यार्थ्यांच्या जीवनात संस्कार व ज्ञानाची ज्योत प्रज्वलित करणाऱ्या निकाळजे यांच्या कार्याचा मान्यवरांनी गौरव केला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अर्जुन मलगुंडे सर होते. त्यांनी निकाळजे यांच्या संघर्षमय जीवनप्रवासाचा उल्लेख करत, नव्या पिढीला हा इतिहास समजणे आवश्यक असल्याचे सांगितले. रयत शिक्षण संस्थेच्या विचारांनुसार त्यांनी केलेली प्रामाणिक सेवा व त्यांचे उत्तम आरोग्य यांचेही त्यांनी कौतुक केले.
प्रमुख पाहुण्यांमध्ये संदीप किर्दत, आबा धायगुडे, विष्णू काटकर, जयपा बेलदार, प्रवीण गायकवाड, सुरेश चव्हाण, प्रशांत शिंदे, गोरख शिंदे, चेतन चव्हाण, सचिन शिंदे, सचिन अहिरेकर, सुप्रिया अहिरेकर, सुरेश भोईटे, प्रतिभाताई शिंदे, मोरे सर, सुतार सर, जाधव मॅडम, थोरात सर व एस.टी. कांबळे सर यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते.
सूत्रसंचालन चंद्रकांत भोईटे सर यांनी केले. प्रास्ताविक सुरेश भोईटे सर यांनी, तर आभार प्रदर्शन दहापट सर यांनी मानले.
या प्रसंगी सहकारी सेवक, भारतीय बौद्ध महासभेचे पदाधिकारी, समता सैनिक दलाचे प्रतिनिधी, बीबीएम फॅमिली तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. तानाजी जगताप, चंद्रकांत निकाळजे व मित्रपरिवाराने व्यक्त केलेल्या भावना कार्यक्रमाला विशेष भावनिक स्पर्श देऊन गेल्या.
निकाळजे सर यांनी आपल्या सेवाकाळात शिक्षण, शिस्त व सामाजिक बांधिलकीचा सुंदर संगम घडवत अनेक विद्यार्थ्यांचे जीवन घडविले. त्यांच्या सेवापूर्ती निमित्त झालेला हा गौरव सोहळा उपस्थितांच्या स्मरणात कायम राहील, अशा भावना व्यक्त करण्यात आल्या. कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी स्वागत गीत सादर केले तसेच हलगीच्या तालावर मान्यवरांचे स्वागत करण्यात आले.
